दिवाळीत लोकांनी स्थानिक उत्पादनेच वापरून ‘व्होकल फॉर लोकल’ या तत्त्वाचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी स्थानिक उत्पादने वापरणे गरजेचे आहे,असे आवाहन करताना त्यांनी सांगितले,की ‘व्होकल फॉर  लोकल’ हा मूलमंत्र आचरणात आणण्यासाठी स्थानिक उत्पादनेच खरेदी करावीत. परदेशी उत्पादने खरेदी करू नयेत, वाराणसीतील लोकांनीही खरेदी करताना स्थानिक उत्पादनेच खरेदी करावी.

वाराणसी येथील  ७०० कोटींच्या १९ विकास  प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले. मोदी यांनी सांगितले की,  दिवाळीच्या निमित्ताने लोकांनी स्थानिक  उत्पादनांना संधी द्यावी, कारण या काळात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असते.

तुम्ही स्थानिक उत्पादने खरेदी करून त्याचा अभिमान बाळगा. त्यामुळे स्थानिक व देशी उत्पादनांचा दर्जा चांगला असल्याचा संदेश इतरांनाही जाईल. यात स्थानिक ओळख तर निर्माण होईलच, त्याशिवाय सगळ्यांची दिवाळीही प्रकाशमान होईल.

‘कृषी सुधारणांमुळे मध्यस्थांना फाटा’

सरकारने तीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून केलेल्या सुधारणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल थेट बाजारपेठेत पोहोचू शकेल व मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकांचे समर्थन केले. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सरकारने राबवलेल्या योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी सुधारणा या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत. त्यांना आता मध्यस्थांशिवाय बाजारपेठेत प्रवेश मिळेल. पूर्वाचलमधील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकरी स्वामित्व योजनेत शेतक ऱ्यांना मालमत्ता पत्रिका दिल्या जाणार असून त्यावर त्यांना कर्ज मिळणार आहेच शिवाय त्यांची जमीनही कुणी बळकावू शकणार नाही.