उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच आपल्याला डी कंपनीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. पाकिस्तानला क्लिन चीट देणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या पाताल लोक या वेब सीरिजला विरोध केल्यानंतर आपल्याला इस्लामाबादशिवाय अन्य इस्लामिक देशांमधून धमकी मिळत असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही गंभीर आरोप करत सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं म्हटलं. तसंच ते सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणीही त्यांनी केली.

“महाराष्ट्रातील सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालत आहे. ते सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावं. महाराष्ट्रात महाविनाश आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. तेव्हापासून महाराष्ट्र अपराध आणि ड्रग्जमध्ये आला आहे. उद्धव ठाकरे एक डमी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. परंतु खरा मुख्यमंत्री तर दाऊद इब्राहिम आहे. याची पडताळणी करण्यासाठी आवश्यकता असल्यास लोकांचे कॉल डिटेल्स काढण्यात यावे,” असंही गुर्जर म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटकेची मागणीही केली. तसंच कंगना रणौतला बॉलिवूड माफियांकडून जिवाचा धोका असल्यामुळे तिच्यासाठी झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अस गुर्जर यांनी नमूद केलं.


“महाराष्ट्रातील ठाकरे सरकार राष्ट्रविरोधी शक्ती आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रभावाखाली असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी काम करत आहे. यामुळे चित्रपट माफिया, नेपोटिझ्म आणि गुन्हेगारी क्षेत्राची एकी झाली आहे. महाराष्ट्र सरकार यात सहभागी होऊन सुशांतसारख्या युवकांची हत्या करत देश पोखरत आहे. आता त्यांना कंगनाची हत्या करायची आहे. कंगनानं त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारवरून सर्वांचा विश्वास उडत चालला आहे,” असं गुर्जर यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावेळी त्यांनी कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवरूनही हल्लाबोल केला. मुंबईत अनेक अनधिकृत इमारती आहेत. परंतु मुंबई महानगरपालिकेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही. त्यांना दाऊदचं संरक्षण असल्याचंही त्यांनी सांगितलं.