झारखंडमध्ये आज विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यावरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर पाच वर्ष सत्ता चालवलेल्या भाजपावर मात्र सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आली आहे. झारखंडमधील निकालावर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना, आम्हाला झारखंडमधील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो असे म्हटले आहे.

आम्ही झारखंडमधील जनादेशाचा आदर करतो. भाजपाला पाच वर्ष जनतेच्या सेवेची जी संधी दिली होती, त्यासाठी आम्ही जनतेचे मनातून आभारी आहोत. राज्याच्या विकासासाठी भाजपा सदैव कटीबद्ध राहील. सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल अभिनंदन, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला डबल धक्का बसला आहे. सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपाच्या जागाही दुपटीनं घटल्या आहेत. तर, झारखंडमधील जनतेने भाजपाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याने, महाराष्ट्रापाठोपाठ आता आणखी एक राज्य भाजपाने गमावले आहे.

तर दुसरीकडे निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यावर,  आजपासून या राज्यासाठी नवा अध्याय सुरू होत आहे. मी नागरिकांना विश्वास देतो की, कोणाचाही अपेक्षाभंग होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमेंत सोरेन यांनी  पत्रकारपरिषदेत व्यक्त केली आहे.