देशातील वाढत्या बेरोजगारीवरुन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सप्टेंबर २०२०ची बेरोजगारीची आकडेवारी समोर आल्यानंतर मोदीजी आपण हे काय केलंत? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

गेल्या नऊ वर्षातील बेरोजगारीच्या दराची तुलना करीत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारं एक कार्ड ट्विटवर पोस्ट केलं आहे. यामध्ये “का किये हो मोदीजी?” असा सवाल करीत दोन्ही बाजूला बेरोजगारीचा दर दाखवणारे स्तंभ दाखवण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या स्तभांखाली २०११-१२ची बेरोजगारीचा दर देण्यात आला आहे जो २.२ टक्के होता. तर दुसऱ्या स्तंभाखाली सप्टेंबर २०२० चा बेरोजगारीचा दर दाखवला आहे जो ६.६७ टक्के इतका आहे. तसेच मध्यभागी मोदी आत्ताच्या ताज्या बेरोजगारीच्या स्तंभाकडे पाहत आहेत आणि खाली ४५ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी असा उल्लेख करण्यात आला आहे.

नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच देशात करोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च २०२० पासून अद्यापपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पाच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीडीपीचा दर मायनसमध्ये पोहोचला. जो आपला शेजारील देश बांगलादेशच्या जीडीपीपेक्षाही खाली गेला. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० ची बेरोजगारीची आकडेवारीही समोर आली. यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ६.६७ टक्के नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने या संधीचा फायदा घेत मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.