कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांमुळे प्रचारात कमालीची रंगत आली आहे. आज (सोमवार) कर्नाटक येथील भालकी येथे झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी आणि राज्यातील सिद्धरामय्या सरकारवर टीकास्त्र सोडले. देशावर जेव्हा-जेव्हा संकट येते, तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वसामान्य नागरिकांचा लुटलेला पैसा पुन्हा वसूल करून तो जनतेच्या कल्याणार्थ वापरला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर देशाला जेव्हा-जेव्हा एखाद्या संकटाचा सामना करावा लागला. तेव्हा राहुलजी देश सोडून इटलीला पळून गेले, असा आरोप त्यांनी केला. भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्यात विकासाला प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले.

काँग्रेसचा दिल किंवा दलितांवर नाही, केवळ ‘डील’वर विश्वास : मोदी

दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केले. तत्पूर्वी, रविवारी पंतप्रधान मोदी यांनी सोनिया-राहुल गांधी आणि काँग्रेसवर आरोप केले होते. ‘काँग्रेसला दिल (मन) किंवा दलितांची नव्हे, तर केवळ डिलची (व्यवहार) चिंता आहे,’ असा घणाघाती हल्ला चढवला होता. काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती. ती दलितवालीही नव्हती. केवळ डीलवाली होती, त्यामुळे आता काँग्रेसला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी आवाहन केले होते.