बिहार, मध्यप्रदेश पाठोपाठ उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशात सध्या विरोधी बाकांवर असलेले दोन्ही पक्षच आमनेसामने आले आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाला असून, बसपाच्या आमदारांनी अखिलेश यादव यांची भेट घेत बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे संतापलेल्या मायावतींनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांनी समाजवादी पार्टी रामजी गौतम यांच्याविरूद्ध उमेदवारी दाखल केली होती. बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या. मायावती म्हणाल्या,”विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडलं गेलं. ही गोष्ट समाजवादी पार्टीला महागात पडेल,” असा इशारा मायावती यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागा पुढील वर्षी जानेवारीमध्ये रिक्त होत आहेत. यातील सहा जागांवर समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. तर दोन आमदार बसपा व तीन आमदार भाजपाचे आहेत. सध्याची स्थिती बघितल्यास या ११ जागापैकी ८ ते ९ जागा भाजपा जिंकण्याची शक्यता आहे. कारण भाजपाची ताकद जास्त आहे. तर एक जागा समाजावादी पार्टी सहज जिंकू शकते. दुसऱ्या जागेवर समाजवादी पार्टीला अपक्ष उमेदवारांसह इतर पक्षांची मदत घेणं आवश्यक असणार आहे.