तामिळनाडूच्या पुडुकोट्टईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक जल्लिकट्टू खेळामध्ये आजपर्यंत संख्येने सर्वाधिक बैल उतरवण्यात आल्याने या खेळाने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. वीरालिमलाईमध्ये यंदा मुक्तपणे सोडलेल्या बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या या खेळात १३५४ बैलांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वी बैलांची सर्वाधिक संख्या ही ६४७ एवढी होती. काल झालेल्या खेळात ४२४ लोक या बैलांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

राम आणि सतीशकुमार अशी या खेळादरम्यान मृत्यू पावलेल्या ३५ वर्षीय तरुणांची नावे आहेत. हा खेळ पाहत असताना बैलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या खेळादरम्यान २ लोकांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, सुरक्षेच्या सर्व मापदंडांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बैलांच्या मालकांनाही आपल्या बैलांना पकडणे कठीण होऊन जाते, जेव्हा ते प्रेक्षकांमध्ये घुसतात. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, सुरक्षेसाठी यामध्ये बैलांना पकडण्यासाठी मजबूत नायलॉनच्या जाळ्या आणि इतर अन्य पर्यायांचा वापर करायला हवा.

२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने बैलांसोबत क्रूरता आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत जल्लिकट्टूवर बंदी आणली होती. मागील दोन दशकांमध्ये या खेळाच्या आयोजनात २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू सरकारने २०१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधानंतर अध्यादेश काढत बंदी उठवली होती.