देशातील करोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ३८२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र असे जरी असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडताना दिसत आहे. कारण, याच कालावधीत देशात ३३ हजार ८१३ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९९ लाख ३२ हजार ५४८ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ३२ हजार २ एवढे अॅक्टिव्ह केसेस असून, ९४ लाख ५६ हजार ४४९ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४४ हजार ९६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

देशभरातील एकूण अॅक्टिव्ह केसेस पैकी ५६ टक्के केसेस या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांमधील आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, करोना चाचणीच्या दरांमध्ये राज्यशासनाने पुन्हा एकदा कपात केली आहे. आता करोना चाचणीचा दर हा ९८० ऐवजी ७८० रुपये इतका असणार आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही काल माहिती दिली . राज्यात करोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरीही नव्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे मात्र अजूनही नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.