भोपाळमधील एका गावात 22 वर्षाच्या एका विवाहितेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सदर महिलेचे तिच्या पतीबरोबर नव्या मोबाइलवरून भांडण झाले होते. आपल्या पतीने स्वस्त मोबाइल दिला म्हणून सदर महिला नाराज होती. तिच्या पतीने तिच्यासाठी 7 हजार 500 रूपयांचा फोन आणला होता. परंतु सदर महिलेला महागातील मोबाइल हवा होता. यातून नाराज होत तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करित आहेत. दरम्यान, विवाहितेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे.

सदर विवाहिता आणि तिचा पती आर्य नगरमधील विहार कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती. तसेच त्या दोघांना एक लहान मुलगीदेखील आहे. तिचा पती हा फॅब्रिकेशनचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर महिलेला 15 हजार रूपयांचा मोबाइल हवा होता. परंतु तिच्या पतीने स्वस्तातील मोबाइल आणून दिला. त्यावरून दोघांमध्ये मोठे भांडण झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भांडणानंतर तिचा पती दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेला. सदर महिला आपल्या मुलीसह अन्य खोलीत झोपण्यासाठी गेली. मध्यरात्री मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर महिलेच्या पतीने दुसऱ्या खोलीकडे धाव घेतली. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या पत्नीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच प्राथमिक माहितीनंतर सदर महिलेने भांडणानंतर आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.