सूक्ष्मलहरींच्या साहाय्याने अचूक लक्ष्यापर्यंत बिनतारी वीजवहन करण्यात जपानमधील एका संशोधकाला यश आले आहे. भविष्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यास अणू, औष्णिक तसेच जलविद्युत प्रकल्पांइतकीच पुरेशी वीज तयार करता येईल, अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
५५ मीटर लांब अंतरावरील वीजसंचात सूक्ष्मलहरींच्या मदतीने १.८ किलोवॉट इतक्या क्षमतेचे वीजवहन अगदी अचूक पद्धतीने करण्यात संशोधकांना यश आले आहे, असे जपान अवकाश मोहीम संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.
सूक्ष्मलहरींचे थेट वीजप्रवाहात रूपांतर करण्यात आले. पश्चिम जपानमधील ह्योगो येथे गेल्या आठवडय़ात हा प्रयोग सफल झाला, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या बातमीत म्हटले आहे.
उच्च क्षमतेच्या सूक्ष्म लहरींना तारांचा वापर न करता त्या छोटय़ा लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा जगातील हा पहिलाच प्रयोग होता, असे संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.
अवकाशातील संशोधनासाठी सूर्यकिरणांपासून मिळणारी वीज वापरली जाते. यात भूस्थानक कक्षेत सौरऊर्जा एकत्रित करून नंतर तिचे पृथ्वीवरील वीजसंचात वहन केले जाते. या प्रयोगाने सौरऊर्जा निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीवरील सौरऊर्जा पटलांना काही मर्यादा असतात, परंतु कृत्रिम उपगृहावर आधारित सौरऊर्जा पटलांना हवामान बदलांमुळे कोणतीही अडचण येत नाही. अशी पटले २४ तास वीज संचय करत असतात. हा प्रयोग अमलात आणायचा झाल्यास पृथ्वीपासून अंदाजे ३५ हजार किलोमीटर अंतरावर वीजसंचय कक्ष बसवून सूक्ष्मलहरींच्या साहाय्याने सौरऊर्जेचे वहन करणे शक्य होईल, अशीही माहिती संशोधकांच्या एका गटाने दिली. याशिवाय उर्जेचीही समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.

येत्या २०३० पर्यंत या प्रयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट बाळगून आहोत.एका अणुभट्टीच्या क्षमतेइतकीच वीज एका वीजसंचात साठवता येईल,
यासुयुकी फुकुमुरो, प्रमुख संशोधक