२ हजार रूपयांची नोट बंद होणार असल्याच्या सध्या अफवा पसरल्या आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीवर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, २ हजार रूपयांची नोट बंद होणार नसून नवी २०० रूपयांची नोट चलनात येणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी याबाबत सांगितले. "२ हजार रूपयांची नोट बंद करण्याबाबत माहित नाही मात्र, या नोटांची छपाई कमी करण्यात आल्याचे खरे आहे. मात्र, यामागचे कारण वेगळे असून याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकच देईल" असे गंगवार यांनी सांगितले. "२०० रूपयांच्या नोटांची छपाई यापूर्वीच सूरू झाली आहे. त्यामुळे लवकरच ती चलनातही येणार आहे. चलनात कमी मुल्याचा पैसा असावा यासाठी २०० रूपयांच्या नोटा आणण्याचा विचार आहे", असेही त्यांना स्पष्ट केले आहे. बराच दिवसांपासून २ हजार रूपयांची नोटांची छपाई सरकारने बंद केल्याची चर्चा होती. याबाबात २६ जुलै रोजी संसदेतही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी विरोधीपक्षांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांना विचारले होते की, सरकार २ हजार रूपयांची नोट बंद करणार आहे का? की याची छपाई बंद केली आहे. मात्र, या प्रश्नांना जेटली यांनी बगल दिली होती. त्यामुळे याबाबत अद्यापही गोंधळाची स्थिती होती. याबाबत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सरकार २ हजार रूपयांच्या नोटा ठराविक मर्यादेत ठेवण्याचा विचार करीत आहे. मात्र, ज्या नोटा छापण्यात आल्या आहेत, त्या चलनात कायम राहणार आहेत. उलट २०० रूपयांची नोट आणून छोट्या नोटांच्या वापरामध्ये वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असावा. सुत्रांच्या माहीतीनुसार, २०० रूपयांची नवी नोट ही ऑगस्ट महिन्यांत चलनात दाखल होईल. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने आपल्या एका अहवालात म्हटले होते की, २०० रूपयांची नोट आल्यानंतर छोट्या आणि मोठ्या नोटांमधील चलनही बाजारात येईल त्यामुळे सुट्ट्या पैशांची कमतरता जाणवणार नाही. कारण, नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या २ हजार रूपयांच्या नोटेमुळे सर्वसामान्यांना सुट्ट्या पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. कारण १०० रूपये आणि ५०० रूपयांच्या खूपच मर्यादित नोटा उपलब्ध होत्या.