गोपेश्वर / डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर ‘नमामि गंगे’ प्रकल्पातील विद्युत रोहित्रामुळे (ट्रान्सफॉर्मर) विजेचा धक्का बसल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गृहरक्षक दलाचे तीन जवान आणि एका पोलिसाचा समावेश असून सात जण जखमी झाले आहेत. ‘नमामि गंगे’ शुद्धीकरण प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वीजप्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली.

चमोलीचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या घटनेचा बुधवारी पंचनामा सुरू होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संरक्षक कठडय़ांमध्ये वीजप्रवाह उतरला. हा धक्का इतका तीव्र होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे काही नातलगही बुधवारच्या घटनेत दगावले. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रावत आणि तीन गृहरक्षक दल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वीजप्रवाह कठडय़ांमध्ये उतरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्याचे पोलिस प्रवक्ते आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) व्ही. मुरुगेशन यांनी मंगळवारी एक तर बुधवारी १५ जणांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आणि तपास सुरू असल्याचे सांगितले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, काही जणांना हेलिकॉप्टरद्वारे ऋषिकेशच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातलगांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत धामी यांनी जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांकडून दूरध्वनी करून या दुर्घटनेची माहिती घेतली.

सखोल चौकशीचे आदेश

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ‘नमामी गंगे’ प्रकल्पातील दुर्घटनेच्या दंडाधिकारीस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चमोलीचे जिल्हाधिकारी हिमांशू खुराणा यांनी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. अभिषेक त्रिपाठी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून, त्यांना एका आठवडय़ात सविस्तर तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताची कारणे आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना व सूचनांचा समावेश अहवालात करण्यास सांगितले आहे.

नेमके काय घडले?

* मंगळवारी रात्री रोहित्रातून विजेचा धक्का बसल्याने एकाचा मृत्यू झाला.

* बुधवारी सकाळी याचा पंचनामा सुरू असतानाच संरक्षक कठडय़ामधून वीज प्रवाही झाली.

* या कठडय़ाच्या संपर्कात असलेल्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

* यामुळे काही जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण रुग्णालयात नेत असताना दगावले.

* दुर्घटनेमध्ये किमान ७ जण जखमी झाले आहेत.