उत्तर प्रदेशात शाळेच्या मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ नोव्हेंबरला शिक्षकाने दहावीत असलेल्या १७ विद्यार्थिनींना बोलावंल आणि सीबीएसईच्या प्रॅक्टिकल परीक्षेचा बहाणा करत शाळेतच थांबण्यास सांगितलं. यानंतर त्याने त्यांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि सहकाऱ्यासोबत मिळून विनयभंग केला. आरोपी मुख्याध्यापक शिक्षक शाळेचा मालकही आहे. खासगी शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनी दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परतल्या. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

या विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहेत. घटनेसंबंधी जर कोणाला सांगितलं तर कुटुंबातील सदस्यांची हत्या करु असं त्यांना धमकावण्यात आलं होतं. यामधील दोन विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थानिक आमदार प्रमोद उत्वल यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांच्याशी संपर्क साधत चौकशी करण्यास सांगितलं. तोपर्यंत मुलींच्या कुटुंबाने वारंवार पोलीस तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यांना मदत मिळत नव्हती असा दावा आहे.

तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार, “मुख्याध्यापक योगेश यांनी प्रॅक्टिरल परीक्षेच्या बहाण्याने आम्हा १६ ते १७ मुलींना बोलावलून घेतलं. आम्हाला लिहायचं असल्याचं सांगत रात्री शाळेतच थांबण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अजून प्रॅक्टिकल असतील असं सांगण्यात आलं. यावेळी मुलींनी खिचडी बनवली असता ती नीट शिजली नसल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. यानंतर त्यांनी स्वत: बनवली आणि आम्हाला खायला दिली. खिचडी खाताच आम्ही बेशुद्ध पडलो आणि त्यानंतर आमचा विनयभंग करण्यात आला”.

पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जिथे विद्यार्थिनी शिकतात आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने ज्या शाळेत नेलं त्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पात पथकं तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.