सोमालियाच्या चाच्यांनी जवळपास वर्षभरापूर्वी अपहरण करून ओलीस ठेवलेल्या २८ भारतीय खलाशांची सुटका केली असून हे खलाशी मायदेशाकडे रवाना झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
नौवहन, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, गृहमंत्रालय, नौवहन महासंचालक आणि अन्य संबंधित संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांना यश आले असून दोन नौकांवरून अपहरण करण्यात आलेल्या २८ भारतीय खलाशांची सोमालियाच्या चाच्यांनी सुटका केली आहे, असे नौवहनमंत्री जी. के. वासन यांनी येथे जाहीर केले.
एमव्ही रॉयल ग्रेसवरील १७ आणि एमटी स्मृनीवरील ११ खलाशांचे मार्च २०१२ मध्ये अपहरण करण्यात आले होते. आता पुढील आठवडय़ात हे खलाशी भारतात परततील. मात्र नऊ भारतीय खलाशांना चाच्यांनी अद्यापही ओलीस ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे, असेही वासन म्हणाले.
चाच्यांच्या कोणत्या मागण्या होत्या आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण करण्यात आल्या, या बाबत वासन यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला. खलाशांची सुरक्षा आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती, असे ते म्हणाले.