3 Indians Missing In Iran : पंजाबमधील संगरूर, होशियारपूर आणि एसबीएस नगर येथून इराणला गेलेले तीन भारतीय बेपत्ता आहेत, अशी माहिती तेहरानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे आणि त्यांना “तातडीने” शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. बेपत्ता झालेल्या तिघांची ओळख पटली आहे. हुशनप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर) अशी त्यांची नावे असून ते सर्व १ मे रोजी तेहरानमध्ये उतरल्यानंतर लगेचच बेपत्ता झाले. या तरुणांचं अपहरण करण्यात आल्याचाा दावा या तरुणांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“इराणला प्रवास केल्यानंतर ही तीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाला दिली आहे. दूतावासाने हा विषय इराणी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे आणि बेपत्ता भारतीयांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी विनंती केली आहे”, असं भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे. दूतावासाने असेही म्हटले आहे की ते त्यांच्याकडून होणाऱ्या प्रयत्नांची “कुटुंबातील सदस्यांना नियमितपणे माहिती देत ​​आहे.”

अपहरणकर्त्यांकडून १ कोटी खंडणीची मागणी

पंजाबमधील एका एजंटने तिघांना दुबई-इराण मार्गाने ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यांना इराणमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. परंतु १ मे रोजी ते इराणमध्ये उतरल्यानंतर लगेचच त्यांचं अपहरण झालं. कुटुंबियांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. अपहरणकर्त्यांनी पिवळ्या दोरीने बांधलेल्या आणि त्यांच्या हातातून रक्त वाहत असतानाचा व्हिडिओ पाठवला होता.

जर पैसे पाठवले नाहीत तर त्यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. होशियारपूरमधील ज्या एजंटने या लोकांना परदेशात पाठवले होते तोही बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.