गुजरातमध्ये ६००० कोटींचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या १४ वर्षांत राज्यातील लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योगांना कोळसा देण्याऐवजी अनेक संस्थांनी इतर राज्यातील उद्योगांना चढ्या दराने विकला. यामध्ये ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गुजरात सरकारच्या संस्थानी राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) नावाने कोळसा मागवला पण तो इतर राज्यांना महागड्या किमतीत विकला. चारा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचे म्हणत काँग्रेसने यामध्ये कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोल इंडियाच्या विविध कोळसा खाणींमधून ज्या उद्योगांसाठी कोळसा काढण्यात आला, त्या उद्योगांपर्यंत तो पोहोचलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे. कोळसा मधूनच गायब करण्यात आला होता. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या घोटाळ्याबाबत सरकारी विभागाचे अधिकारी, कोळसा वाहतूक व्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत मौन बाळगले.

गुजरातमधील व्यापारी आणि लघु उद्योगांच्या नावावर कोल इंडियाच्या खाणीतून ६० लाख टन कोळसा पाठवण्यात आला आहे. ज्याची सरासरी किंमत १,८०० कोटी रुपये प्रति टन ३,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र तो व्यापारी आणि उद्योगांपर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर ८ ते १० हजार रुपये प्रति टन दराने इतर राज्यात विकून घोटाळा करण्यात आला होता.

या घोटाळ्याबाबत केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल जैन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्य सरकारने नेमलेल्या संस्थाना कोळसा दिला जातो. त्यानंतर आमची त्यात कोणतीही भूमिका नाही. कोल इंडियाचे संचालक सत्येंद्र तिवारी म्हणाले की, राज्य सरकारचा उद्योग विभाग संस्था नियुक्त करतो.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात  ट्विट करत भाजपावर टीका केली आहे. “गुजरात सरकारमध्ये ६,००० कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा! खाणीतून ६० लाख टन कोळसा आला आणि गायब झाला. भाजपा सरकारने चार खाजगी कंपन्यांना कोळसा आणण्यासाठी अधिकृत केले असून, तिघांचे पत्ते बनावट आहेत,” असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे दुसरे नेते संजय निरुपम यांनी, “गुजरात कोळसा घोटाळा हा चारा घोटाळ्याचा जनक आहे. खाणीतून ६० लाख टन कोळसा बाहेर आला. वाटेतच गायब झाला. ६००० कोटींची लूट केली. या दरोड्यात कोणाचा हात आहे,” याचा तपास होणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

कसा झाला घोटाळा?

गुजरातमध्ये सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा समोर आल्याचा दावा दैनिक भास्करच्या वृत्तात करण्यात आला आहे. गेल्या १४ वर्षात गुजरात सरकारच्या अनेक एजन्सींनी राज्यातील लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योगांना कोळसा देण्यापेक्षा जास्त किमतीला कोळसा इतर राज्यांतील उद्योगांना विकून पाच हजार ते सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल इंडियाच्या विविध कोळसा खाणींमधून काढण्यात आलेला कोळसा ज्या उद्योगांसाठी काढण्यात आला त्या उद्योगांपर्यंत पोहोचलाच नाही, असे या अहवालात म्हटले आहे. कागदपत्रांचा हवाला देत अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोल इंडियाच्या खाणीतून आतापर्यंत गुजरातमधील व्यापारी आणि लघु उद्योगांच्या नावावर ६० लाख टन कोळसा पाठवण्यात आला आहे. त्याची सरासरी किंमत १,८०० कोटी रुपये ३ हजार रुपये प्रति टन आहे, पण व्यापारी आणि उद्योगांना ती विकण्याऐवजी ८ ते १० हजार रुपये प्रति टन या दराने इतर राज्यात विकून काळाबाजार केला जात आहे.