काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. स्वपक्षाच्याच धोरणांवर काही प्रसंगी त्यांनी टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर आचार्य प्रमोद कृष्णम लवकरत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. त्यात आता त्यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
“आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याविरोधात सातत्याने होत असलेले बेशिस्तीचे आरोप आणि जाहीरपणे पक्षाविरोधात केली जाणारी वक्तव्य पाहाता काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य केली आहे. या शिफारशीनुसार आचार्य प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, असं पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट या कारवाईसाठीचं तत्कालीक कारण ठरल्याचं बोललं जात आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी येत्या १९ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या संबलमधील श्री कलकी धामच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं.
“या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्याचं भाग्य मला लाभलं. हे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी मोदींचे आभार मानतो”, असं आपल्या पोस्टमध्ये आचार्य यांनी म्हटलं आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना “या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. या आमंत्रणासाठी मी आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आभार मानतो”, अशी पोस्ट पंतप्रधानांनी केली होती.
काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णम भाजपाच्या वाटेवर?
राम मंदिर सोहळ्याला हजेरी
एकीकडे काँग्रेसकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याची भूमिका जाहीर केलेली असताना आचार्य प्रमोद कष्णम हे मात्र या सोहळ्याला हजर होते. मात्र, त्याचवेळी भारत जोडो न्याय यात्रेला मात्र आचार्य उपस्थित नव्हते. त्यावेळी ही यात्रा म्हणजे काँग्रेस २०२४ नव्हे तर २०२९ च्या निवडणुकीची तयारी करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता.