Air India Flight Crashes near Ahmedabad: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून जवळच एक विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. गुजरातच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळलं आहे. हे एअर इंडियाचं प्रवासी विमान असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती देणारी पोस्ट एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळलं असल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघाताचे थरारक Video व्हायरल

दरम्यान, एकीकडे या अपघातात किती जीवित वा वित्तहानी झाली असावी याचा अंदाज यंत्रणांकडून घेतला जात असताना दुसरीकडे या अपघाताचे थरारक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विमान कोसळल्यानंतर आगीचे भीषण लोळ हवेत पसरल्याचं काही दृश्यांमध्ये दिसून येत आहे. एका व्हिडीओमध्ये नेमका अपघात झाला तेव्हाचा क्षण कैद झाला असून विमान कोसळताच आगीचे मोठे लोट आकाशात उसळल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.

हे एअर इंडियाचं ७८७ ड्रीमलायनर विमान होतं, अशी प्राथमिक माहिती हाती आली असून अद्याप अपघात नेमका का झाला? याचं कारण समजू शकलेलं नाही. यासंदर्भात विमानातील ब्लॅक बॉक्स हाती लागल्यानंतर त्याविषयी अधिकृत माहिती मिळू शकेल असं सांगितलं जात आहे.

काही दृश्यांमध्ये स्थानिक बचाव कार्याची दृश्य दिसत असून त्यात विमानाचे जळून कोळसा झालेले अवशेष दिसून येत आहेत. ज्या भागात हे विमान कोसळलं तिथे एक रुग्णालय, एक हॉस्टेल होतं असंही सांगितलं जात आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येनं दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल झाली आहेत.

आंतरराष्ट्रीय विमान..

दरम्यान, अपघातग्रस्त झालेलं विमान हे आंतरराष्ट्रीय प्रवासाचं विमान असल्याचं सांगितलं जात आहे. अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं या विमानानं टेकऑफ केलं होतं. मात्र, टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान अपघातग्रस्त झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या प्रमाणावर इंधन साठा

तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञ मंदार भारदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाण असल्यामुळे विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन साठा असू शकतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे झालेलं नुकसानदेखील तेवढं जास्त असू शकतं.