Aligarh Love Story: उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे एक महिला आपल्याच मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासह घरातून पळाली होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. होणाऱ्या जावयाबरोबर पळ काढल्यानंतर अलीगढ पोलीस दोघांचाही गेल्या दहा दिवसांपासून शोध घेत होते. मात्र आज पोलिसांना दोघांना शोधण्यात यश मिळाले आहे. १६ एप्रिल रोजी जावयाची वरात सासूच्या घरी येणार होती. या लग्नाच्या दिवशी दोघेही पोलीस ठाण्यात शरण आले.
प्रकरण काय आहे?
अलीगढमधील मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर प्रकरण घडले होते. याच गावात राहणारे जितेंद्र कुमार बंगळुरूत काम करतात. महिन्यांपूर्वी त्यांनी आपली मुलगी शिवानीचे लग्न राहुल नामक मुलाशी ठरविले होते. लग्नासाठी ५ लाखांचे दागिने तयार केले. साडे तीन लाखांची रोकड जमा केली. मात्र दरम्यान होणाऱ्या जावयाचे आणि सासूचे सूत जुळले. ६ एप्रिल रोजी सासू आणि जावई फरार झाले. पळून जाण्याआधी सासूने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी बनविलेले दागिने आणि रोकडही लंपास केली होती.
सासू आणि जावई पळून गेल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीन पथके तयार करून दोघांचा शोध सुरू केला होता.
महिलेने सांगितले पळून जाण्याचे कारण

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सासूने तिच्या पतीवर मारझोड करण्याचा आरोप केला. माझा पती मद्याचे सेवन करून मारझोड करतो. तसेच आता यापुढचे जीवन ती राहुलबरोबरच घालवू इच्छिते असेही सांगितले. मुलीचे राहुलशी लग्न ठरल्यानंतर त्याचा अधे-मधे फोन आला की, मी राहुलशी फोनवर बोलायचे. यावरून मुलगी आणि पती दोघेही माझ्यावर राग-राग करत होते. माझ्यावर नको नको ते आरोप लावत होते. त्यामुळे मी राहुलबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पळून गेल्यावर कुठे कुठे गेले?

जावई राहुलने पोलिसांना कसा गुंगारा दिला, याची इत्थंभूत माहिती दिली. सासू अलीगढवरून कासगंजला आली. तिथून बसने दोघे बरेलीला गेले. त्यानंतर तिथून बिहारमध्ये गेले. दोन दिवसांनी मोबाइल तपासला असता बातम्यात आणि सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरू असल्याचे कळले. बिहारमध्ये काही दिवस राहून मग आम्ही दिल्लीत गेलो आणि तिथून आज पुन्हा अलीगढमध्ये आलो, असे राहुलने सांगितले.