राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे राज ठाकरे हे महायुतीत येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही भेट नव्या बदलाची नांदी मानली जाते आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर ते लोकसभा लढवणार का? त्यांची काय भूमिका असणार? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात अमित ठाकरेंनी राज ठाकरे-अमित शाह भेटीविषयी केलेली पोस्ट चर्चेत आहे. तसंच महायुतीतल्या नेत्यांनीही त्यांच्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे? “राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. हे पण वाचा- राज ठाकरे आणि अमित शाह भेट ही नव्या पर्वाची सुरुवात? भाजपा-मनसे एकत्र येणार? अतुल भातखळकर काय म्हणाले? “राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजपाच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्याला जे समर्थन देतात त्यांचं आम्ही महाराष्ट्रात, महायुतीत स्वागत करु. राज ठाकरेंनी तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की ४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात ४०० पार हे भाजपा आणि रालोआला मिळणार आहेत. राज ठाकरे महायुतीत आले तर त्याचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल.” अमित ठाकरेंची पोस्ट काय? "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!" ही पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे. अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार त्यांना बोलवलं आहे म्हणून ते दिल्लीत गेले आहेत. आता अमित शाह यांनी जर त्यांना बोलवलं असेल तर ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच महत्त्वाची मानली पाहिजे. कारण राज ठाकरे हे जर महायुतीत सहभागी झाले तर ‘ठाकरे ब्रांड’ पुन्हा एकदा महायुतीबरोबर येईल.