महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मोठा धमाका झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. या सर्व घडामोडींवर सर्वच क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर मतमतांतरे होत आहेत. अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत सध्याची परिस्थितीवर व्यक्त झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी शेअर केलेला कबड्डीचा व्हिडीओ त्यांनी पुन्हा एकदा शेअर केला आहे. या व्हिडीओवर त्यांनी लिहिलं, “मी ट्विट केलेला हा व्हिडीओ आठवतोय? महाराष्ट्रात सध्या जे काही घडलं त्यावर भाष्य करणारा यापेक्षा चांगला व्हिडीओ असूच शकत नाही.” काही दिवसांपूर्वी त्यांनी हाच व्हिडीओ शेअर करत छोटया छोटया अपयशांनी खचून न जाताना त्यातून शिकण्यासारखे भरपूर काही असते असं म्हटलं होतं.

काय आहे व्हिडीओत?

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या कबड्डी सामन्याच्या या व्हिडीओमध्ये चढाईपटू प्रतिस्पर्धी संघातील बचावफळीतील एका खेळाडूला बाद करतो. त्यानंतर चढाईपटू लगेच आपल्या क्षेत्रात निघून जाण्याऐवजी मध्यरेषेच्या जवळ उभा राहतो. त्यावेळी बाद झालेला खेळाडू चालत चढाईपटूच्या दिशेने जातो. खरंतर चढाईपटूची बाजू वरचढ असते. बाद झालेल्या खेळाडूला फारशी संधी नसते. पण बाद झालेला खेळाडू चढाईपटूला आत खेचताच बचावफळीतील अन्य कबडीपट्टू चढाईपटूची कोंडी करुन त्याला बाद करतात. काही क्षणांपूर्वी अशक्य वाटणारी एक गोष्ट शक्य होते. हाच या व्हिडीओ मागचा खरा अर्थ आहे.