अभिनेत्री कंगना रणौतने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्या खूप टीका झाली. तसेच तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशीदेखील मागणी होत होती. दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर ओवेसींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच “कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर युएपीए अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती, तसेच पायावर गोळी झाडत तरुंगात रवानगी करण्यात आली असती,” असं ओवेसी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ती ‘क्वीन’ आहे आणि तुम्ही इथले राजे आहात, त्यामुळे तिच्यावर तुम्ही कारवाई करणार नाही.” असं म्हणत ओवेसींनी सरकारवर निशाणा साधला. “बाबांनी तर टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काही बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकलं होतं” असं म्हणत ओवेसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीयांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्न त्यांनी योगी आणि मोदींना विचारला. “देशद्रोहाचा गुन्हा फक्त मुस्लिमांवरच लागू होतो का?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले. “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती.

“मी माझ्या सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असते,” असेही कंगनाने सांगितले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi slams kangana ranaut over her controversial statement on freedom hrc
First published on: 15-11-2021 at 11:28 IST