पाण्याचे महत्त्व आपल्या जीवनात किती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आत्ता कुठे मार्च महिना संपतोय आणि देशातील काही भागात आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. पिण्याच्या पाण्याचा इतर गोष्टींसाठीच वापर होताना सर्रास पहायला मिळते. यासंबधित प्रकरणात बंगळुरुमध्ये अनेकजणांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू शहर हे गेल्या दशकभरात सर्वात मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला शहरातील काही नागरिक पाण्याचा गैरवापर करताना दिसत आहेत. दोन चाकी, चार चाकी वाहने धुण्यासारख्या अनावश्यक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होताना दिसत आहे. अशा गोष्टी करणाऱ्या शहरातील नागरिकांना आता प्रशासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

१.१० लाख रुपयांचा दंड ठोठावला

दोन चाकी, चार चाकी वाहनांची सफाई करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या तब्बल २२ कुटुंबांना १.१० लाख रुपयांचा दंड बंगळुरू शहर प्रशासनाने ठोठावला आहे. बंगळुरूच्या नागरिकांना प्रशासनाने पाणी काटकसरीने वापरण्याचे आव्हान केले आहे. त्याप्रमाणे वाहने साफ करणे, बागकाम, इमारत बांधकाम, कारंजे चालवणे इत्यादींसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावरही बंदी घातली आहे. दक्षिण आणि पूर्व भागातील नागरिक पाण्याचा अनावश्यक वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे तिथे कारवाई करण्यात आली. दंडस्वरुपात वसूल केलेल्या १.१० लाख रुपयांपैकी ६५ हजार रुपयांचा दंड याच भागातून वसूल झाला आहे. कारवाईचे इशारे देऊनही नागरिक पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग थांबवत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला कारवाई करावी लागते, अशी प्रतिक्रिया बंगळुरूच्या पाणी व्यवस्थापन विभागाचे अधिकारी राम प्रशांत मनोहर यांनी दिली आहे.

प्रशासनाने पत्रक काढले

दिवसेंदिवस बंगळुरू शहराच्या तापमानात वाढ होत असून, अलिकडच्या काही दिवसांत पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा होणारा अपव्यय रोखणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जनतेने पिण्याचे पाणी जपून वापरावे अशा स्वरुपाचे एक पत्रक काढले असल्याची माहिती अधिकारी राम प्रशांत मनोहर यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांकडून पाणी स्थितीवर भाष्य

दरम्यान, अलिकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूतील पाणी स्थितीवर भाष्य केलं होतं. बंगळुरूला रोज एकूण २ हजार ६०० एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी ५०० दशलक्ष (एमएलडी) लिटर पाणी सध्या कमी उपलब्ध होत आहे. ते असेही म्हणाले होते की बंगळुरूमधील १४ हजार बोअरवेलपैकी ६९०० कोरड्या पडल्या आहेत.