Bengaluru Central Jail Viral Video Case : बंगळूरुमधील सेंट्रल कारागृहातील काही कैदी मोबाईलचा वापर करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा कैद्यांची तुरुंगात जंगी पार्टी झाल्याचा आणखी एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आणि कारागृह प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणानंतर कर्नाटक सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आहे.

बंगळुरूमधील परप्पा अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना व्हीआयपी वागणूक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नाटक सरकारने तीन वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दोन कारागृह अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे, तर एका कारागृह अधीक्षक अधिकाऱ्याची तात्काळ बदली केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?

व्हायरल होणाऱ्या तुरुंगातील व्हिडीओत कैदी दारू पिऊन डान्स करताना दिसत होते. एवढंच नाही तर व्हिडीओत कारागृहाच्या आतमध्ये दारू, फळे दिसत असून कैदी चक्क डान्स करत असल्याचं दिसून आलं होतं. दारूने भरलेले डिस्पोजेबल ग्लास, कापलेल्या फळांच्या प्लेट्स, तळलेले शेंगदाणे (चकणा) आणि काही कैदी भांडी वाजवत होते आणि त्यावर काही कैदी डान्स करत तुरुंगात पार्टी करत असल्याचं दिसून आलं होतं.

‘…तर सरकार हे सहन करणार नाही’ : कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितलं की, “सरकार कोणत्याही किंमतीत अशा घटना सहन करणार नाही. या संदर्भातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जर हे असंच चालू राहिलं तर आपण त्याला तुरुंग का म्हणायचं असं म्हणत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी कारवाईचा इशारा दिला होता.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन आणि एफआयआरची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगत पुढील पावले उचलली जातील, असा गृहमंत्री जी परमेश्वर यांनी इशारा दिला होता. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

गृहमंत्री जी परमेश्वर यांनी असंही म्हटलं होतं की, “तुरुंग अधिकारी अनेकदा म्हणतात की कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पण कर्मचाऱ्यांनी किमान त्यांची कर्तव्ये तरी व्यवस्थित पार पाडले पाहिजेत. जर ते कर्मचाऱ्याच्या कमतरतेचं कारण पुढे करून मोबाईल फोन आणि इतर गोष्टी कैद्यांना पुरवत असतील तर त्याला तुरुंग का म्हणायचं?”, अशी संतप्त प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली होती.