'कोसला' आणि 'हिंदू' या लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील संसदेच्या बालयोगी सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी शाल, श्रीफळ आणि पुरस्कार देऊन नेमाडे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानानंतर भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी भाषेत उपस्थितांना संबोधित केले.मराठी साहित्यातील योगदानाबद्दल नेमाडे यांना ७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत. यापूर्वी वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांना हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला होता.