राजधानी दिल्लीमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या ‘पोलीस युद्धा’वर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. दिल्लीत सुरू असलेल्या अराजक परिस्थितीला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) जबाबदार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाषा माओवाद्यांसारखी असून, सरकार कसे चालवावे आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण कशी करावी याचे त्यांना अजिबात ज्ञान नाही, असा आरोप भाजपने केला. ‘दिल्लीत निर्माण झालेली परिस्थिती आप आणि काँग्रेस यांनी निर्माण केली आहे. केजरीवाल तर निर्थक प्रश्न निर्माण करत आहेत. शील दीक्षित यांच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. मात्र आंदोलन करून ते या मंत्र्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला.