भाजपचे अध्वर्यू, माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिर आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता. त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. उपराष्ट्रपती जगदीप धनखडही यावेळी उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार प्रदान करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून आता टीका होऊ लागली आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत, असं प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा >> राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत. पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. ही पहिली वेळ नाही, नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही राष्ट्रपती दिसल्या नाहीत. या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाची मानसिकता महिलाविरोधी आणि दलितविरोधी असल्याचे दिसून येते.

“देशाच्या प्रथम नागरिकाचा म्हणजेच महामहिम राष्ट्रपतींचा आदर हा सर्वांत महत्त्वाचा असायला हवा”, असं समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

“द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली, त्यावेळी भाजपाने त्यांच्या आदिवासी या समाजाचा हा सन्मान असल्याचं भासवलं होतं. पण आज त्याच महामहीम राष्ट्रपती महोदयांचा हा फोटो बघून मनात विचार आला, की भाजपा नेमका सन्मान करतंय की अवमान?”, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला.

या फोटोंवरून वादंग निर्माण झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रपती जेव्हा एखाद्याला पुरस्कार देतात तेव्हा पुरस्कार घेणारा व्यक्ती उभा राहतो आणि इतर उपस्थित मान्यवर बसलेले असतात. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर बसून होते, असं विनोद तावडे आहेत.

दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत खुलासा आलेला नाही.