पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये अडवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. ‘सुरक्षेतील या गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून मोदींना दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झालाय. भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार करताना दिसत आहेत. असं असतानाच ज्या शेतकरी संघटेनं मोदींचा ताफा अडवला त्या संघटनेच्या नेत्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर जवळपास सर्व शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन संपवले असताना, पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना अशी ओळख असणाऱ्या भारतीय किसान युनियने (क्रांतीकारी) (बीकेयू क्रांतीकारी) अजूनही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु ठेवले आहे. याच संघटनेच्या आंदोलकांनी बुधवारी फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

पंजाबमधील सुमारे १६ जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेली बीकेयू क्रांतीकारी ही शेतकरी संघटना या आंदोलनामुळे चर्चेत आलीय. एकीकडे यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु असतानाच बीकेयू क्रांतीकारीच्या मुख्य नेत्यांनी या आंदोलनाबद्दल समाधन व्यक्त करत आंदोलकांचं कौतुक केलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: फ्लायओव्हरवर अडकलेला ताफा, कारमध्ये बसलेले PM मोदी, सुरक्षारक्षकांचा वेढा अन्…; पाहा नक्की काय घडलं

बीकेयू क्रांतीकारीचे नेते सुरजीत सिंग फूल यांनी या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मोदींचा ताफा अडवून भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र असल्याचं सुरजीत सिंग फूल यांनी म्हटलंय. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीजवळचा मोगा-फिरोझपूर मार्ग ज्या पद्धतीने बिकेयूच्या नेत्यांनी (काल, ५ जानेवारी २०२१ रोजी) अडवून धरला आणि त्याचमुळे भाजपा नेत्यांना खराब रत्यावरुन प्रवास करावा लागला, ते पाहता आंदोलकांचं कौतुक केलं पाहिजे. मी त्या सर्वांचे आभार मानतो,” असं सुरजीत सिंग फूल म्हणालेत.

बीकेयू क्रांतीकारी संघटना २० डिसेंबरपासून १२ उपायुक्त कार्यालये आणि चार सरकारी कार्यालयांसह १५ जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करत आहे. हे आंदोलन केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्या विरोधात असून सरकारी धोरणांमुळे शेती संकटात आहे असे युनियनचे म्हणणे आहे. याशिवाय ५ जानेवारीच्या फिरोजपूर येथील रॅलीपूर्वी सोमवारी राज्यभरातील ६४९ गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आल्याचे संघटनेनं म्हटलं आहे. केंद्राने तीन कृषी कायदे रद्द केले म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असे नाही, असे या शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bku krantikari leader surjeet singh phool praises protesters after narendra modi punjab security lapse scsg
First published on: 06-01-2022 at 14:18 IST