India Pakistan Tensions : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर सातत्याने हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देखील दिले. या सर्व घडामोडीदरम्यान १० मे रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये संवाद होऊन शस्त्रविराम जाहीर करण्यात आला. मात्र शस्त्रविरामाच्या घोषणेनंतरही काही तासांतच पाकिस्तानकडून सीमेवरील काही भागात गोळीबार करण्यात आला. यातच सोमवारी रात्री पुन्हा जम्मूच्या काही भागात संशयित ड्रोन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोमवारी (१२ मे) रात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबाजवळ काही संशयास्पद ड्रोन आढळून आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. याबरोबच आढळून आलेल्या ड्रोन्सची संख्या कमी असल्याचे तसेच यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
तसेच यावेळी सांबा येथे ब्लॅकआऊट जाहीर करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कानाचक, परगवाल आणि केरी बट्टल भागात सीमेपलीकडून गोळीबार सुरू झाल्याने जम्मूमधील अखनूरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पंजाबमधील अमृतसर आणि होशियारपूरमधील अधिकाऱ्यांनीही ब्लॅकआउट लागू करण्याचे आदेश जारी केले.
आम्हाला अलर्ट मिळाला आणि प्रोटोकॉलनुसार आणि सावधगिरी भाग म्हणून आम्ही ब्लॅकआउट केले आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरातच राहा असे सांगण्यात आले आहे, असे अमृतसरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
होशियारपूरच्या उपायुक्त आशिका जैन यांनी जारी केलेल्या एक व्हिडीओ संदेशात सांगितलं की, मुकेरियन आणि दसुया सबडिव्हीजनमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे आणि सध्या या भागातील वीजपुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. लष्कराने दिलेल्या सल्ल्यानुसार ही खबरदारी घेतली जात असल्याचे जैन यांनी सांगितले.