BSF Jawan Returns to India: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून पार केल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफचे जवान पूर्णम शॉ यांना ताब्यात घेतले होते. बुधवारी (दि. १४ मे) रोजी पूर्णम शॉ यांना पुन्हा भारतात सोडण्यात आले आहे.
बीएसएफने निवेदनाद्वारे सदर माहिती दिली आहे. “पाकिस्तानी रेंजर्सनी २३ एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेतलेल्या जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी १०.३० वाजता त्यांना सोडण्यात आले. बीएसएफ जवानाचे हस्तांतर अतिशय शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.”
४० वर्षीय पूर्णम शॉ यांनी २३ एप्रिल रोजी पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. तब्बल २० दिवसांनी त्यांची आता सुटका झाली आहे.
पूर्णम शॉ हे मुळचे पश्चिम बंगालचे आहेत. सध्या त्यांची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
पूर्णम शॉ यांना भारताच्या स्वाधीन केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने एक्सवर पोस्ट करत समाधान व्यक्त केले आहे. “शेवटी ते घरी येत आहेत. अनेक दिवस अनिश्चिततेच्या सावटाखाली घालविल्यानंतर बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून त्यांच्या पत्नीशी अनेकदा संपर्क साधला होता आणि सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेच्या धक्क्यातून शॉ लवकर बाहेर येतील, अशी प्रार्थना करू.”
पूर्णम शॉ हे बीएसएफच्या १८२ व्या बटालियनचे जवान आहेत. २३ एप्रिल रोजी फिरोजपूरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ गस्त घालत असताना ते सीमेपलीकडे गेले. यावेळी त्यांनी गणवेश परिधान केलेला होता आणि त्यांच्याकडे सर्व्हिस रायफलही होती. विश्रांतीसाठी सावलीत थांबण्यासाठी गेल्यानंतर ते चुकून सीमेपलीकडे गेले होते. तिथून पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली.
पूर्णम शॉ यांच्या अटकेनंतर भारतीय लष्कर आणि पाकिस्तानच्या रेंजर्स अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी बैठक घेतली आणि त्यातून तोडगा निघाल्यानंतर शॉ यांची सुटका झाली.