मेहनत आणि कष्ट उपसण्याची तयारी असेल तर स्वप्न साकार होते. प्रबळ इच्छा असेल तर मार्ग हा निघतोच. सीमा सुरक्षा दलाचा माजी अधिकारी हरप्रीत सिंहने हे सिद्ध करुन दाखवले आहे. कठीण समजल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन हरप्रीत सिंह भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) पात्र ठरले आहेत. पाचव्या प्रयत्नात हरप्रीत यांनी हे यश मिळवताना पहिल्या २० जणांमध्ये स्थान मिळवले आहे.

२०१६ ते २०१७ अशी एक वर्षच हरप्रीत यांनी बीएसएफमध्ये नोकरी केली. आयएएस अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. दृढ निश्चय आणि मेहनत हा यशाचा साधा सोपा मंत्र आहे असे हरप्रीतने सांगितले. २०१६ साली यूपीएससीच्या माध्यमातून मी सहाय्यक कमांडट म्हणून बीएसएफ म्हणून रुजू झालो.

बीएसएफमध्ये रुजू झाल्यानंतर मी भारत-बांगलादेश सीमेवर तैनात होतो. कामाचे व्यस्त वेळापत्रक असले तरी मला त्यात आनंद मिळायचा असे हरप्रीत यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर डयुटी बजावत असतानाही आयएएसचे उद्दिष्टय पूर्ण करण्यासाठी हरप्रीत अभ्यासासाठी वेळ काढायचे. हरप्रती इंडियन ट्रेड सर्व्हीससाठी पात्र ठरले होते. त्यांनी पुन्हा प्रवेशपरीक्षा देऊन आयएएसमध्ये १९ वा क्रमांक मिळवला.

बीएसएफमध्ये असताना नागरी सेवा परीक्षा दिली. त्यावेळी ४५४ क्रमांक मिळाला. त्यातून इंडियन ट्रेड सर्व्हीससाठी निवड झाली. मी बीएसएफची नोकरी सोडली आणि आयटीएसमध्ये दाखल झालो. पुन्हा २०१८ साली नागरी सेवा परीक्षा दिली आणि १९ वा क्रमांक मिळवला असे हरप्रीत यांनी सांगितले.