माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उमा भारती यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणजे काहीच नाहीत, ते चपला उचलण्याचे काम करतात, असे विधान उमा भारती यांनी केले आहे. उमा भारती म्हणाल्या की, " प्रशासकीय अधिकारी म्हणजे काही नाही. ते आमच्या चपला उचलतात. यासाठी आम्ही राजी असतो. तुम्हाला काय वाटते, अधिकारी नेत्यांना फिरवतात? असे अजिबात नाही, आधी खाजगीत चर्चा होते, मग अधिकारी फाईल बनवून आणतात. मला विचारा, कारण मी ११ वर्षे केंद्रात मंत्री राहीले आहे. मुख्यमंत्री देखील होते. प्रथम आम्ही बोलतो, चर्चा करतो, नंतर फाइलवर प्रक्रिया केली जाते." हेही वाचा - भारतातील लसीकरण लंडनमध्ये ग्राह्य नाही; अलगीकरणात राहावं लागणार उमा भारती म्हणाल्या की "सर्व मूर्ख आहेत, जे म्हणतात प्रशासकीय अधिकारी नेत्यांना फिरवतात. ते फिरवूही शकत नाहीत, त्यांची औकात काय आहे. आम्ही त्यांना पगार देतो, आम्ही त्यांना पोस्टिंग देतो, आम्ही त्यांना पदोन्नती देतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. खरी गोष्ट अशी आहे की, आपण अधिकाऱ्यांच्या बहाण्याने आपले राजकारण करतो." शनिवारी ओबीसी महासभेचे एक शिष्टमंडळ माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भोपाळ येथील बंगल्यावर पोहोचले होते. ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला होता की, मध्य प्रदेश सरकारला ओबीसी महासभेच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा ओबीसी महासभा रस्त्यावर उतरून भाजपा खासदार, आमदार आणि मंत्र्यांविरोधात तीव्र आंदोलन करेल. या दरम्यान, ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाशी बोलताना उमा भारती यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली.