आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा कंबर कसून कामाला लागली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला आपला दृष्टीकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पक्षाला आपली रणनीती ठरवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सध्या देशापुढे असलेल्या प्रश्नांप्रती अधिक संवेदनशील होण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलून दाखवली आहे.

याविषयी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरप्रदेशातले मंत्री आणि पक्षाचे काही नेते यांच्यासोबत नोएडामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकानी मार्गदर्शन केलं. वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी उत्तरप्रदेशात चाललेल्या शेतकरी आंदोलनाला शांतपणे हाताळावे, तसंच त्याबद्दल संवेदनशील भूमिका घ्यावी, असा सल्ला या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याआधीही सार्वजनिकरित्या शेतकरी आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जाट आणि शिख यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहेत, असा सूर यामुळे आळवला जात असल्याचं संघाने बोलून दाखवलं होतं. हे पक्षासाठी घातक ठरू शकतं, असंही संघाने म्हटलं होतं. प्रमुख नेत्यांच्या अनेक गटांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल यांनी सांगितलं की पक्षाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीशी शांत आणि सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी.

भाजपालाही हे कळून चुकलं आहे की, शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमधल्या शिख समुदायात तसंच जाट समुदायात पक्षाबद्दल प्रचंड असंतोष आहे. मात्र, तरीही पक्षाला असं वाटत आहे की शेतकरी आंदोलन हा एकच मुद्दा निवडणुकीत प्रमुख भूमिका बजावणार नाही. त्यामुळे पश्चिम उत्तरप्रदेशातले जाट समुदायातले लोक पक्षालाच मत देतील, अशी आशा त्यांना आहे. मात्र, नुकतंच घडलेलं लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण परिस्थिती अधिक बिकट करु शकतं.