न्याययंत्रणेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी खटले वेगाने निकाली काढण्याची आवश्यकता असून, सामान्यांना न्याय सहज मिळणे गरजेचे आहे, असे मत सरन्यायाधीश पी. सत्यशिवम् यांनी येथे मांडले. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या नव्या अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. न्याययंत्रणा देशातील सर्वात आदरणीय संस्था असून तिची विश्वासार्हता जपलीच पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले खटले वेगाने निकाली कसे निघतील हे बघण्याची, तसेच न्याययंत्रणेप्रती लोकांचा आदरभाव आणि विश्वास नष्ट न होऊ देण्याची जबाबदारी न्यायालयांवर आहे, असे आवाहन सत्यशिवम् यांनी केले. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना पत्रे लिहून दीर्घकाळ प्रलंबित असलेले खटले, विशेषत: महिला आणि अल्पवयीन मुलांशी संबंधित असलेले निकाली काढण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली होती, असे ते म्हणाले.