करोना प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द कऱण्यात आल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. या आधारावर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याची शिफारस CBSE बोर्डाकडून करण्यात आली आहे.  ३१ जुलै रोजी CBSE चे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं.

यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल.


त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. निकालाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यांची एक समिती गठीत कऱण्यात आली होती. या समितीने हा मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.