झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मॉर्निंग वॉकला गेलेले जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद यांचा एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. मात्र या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा अपघात होता कि घातपात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्या गाडीच्या धडकेमध्ये आनंद यांचा मृत्यू झाला त्या गाडीने मुद्दाम त्यांना धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. माजी आमदाराच्या मर्जीतील व्यक्ती असणाऱ्या रंजय हत्याकांडसारख्या प्रकरणाबरोबरच अनेक महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या आनंद यांची हत्या करण्यात आलीय का असा प्रश्न उपस्थित होत असतानचा पोलिसांनीही ही शक्यता पडताळून पाहण्याच्या दृष्टीने तपास सुरु केलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्ल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांसंदर्भातील माहिती लवकरच दिली जाईल आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्व ते सगळे प्रयत्न करतील. मात्र या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करावी अशी मागणी माजी आमदाराने केलीय.

धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे बुधवारी सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झालाय. या सीसीटीव्हीमध्ये आनंद हे रस्त्याच्या कडेने धावताना दिसत आहेत तर त्याच रस्त्यावरुन एक मोठ्या आकाराची रिक्षा (टमटम रिक्षा) रस्त्यावरुन सरळ जात असताना दिसते. मात्र अचानक ही रिक्षा रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या आनंद यांना धडक देऊन निघून जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जाणूनबुजून या रिक्षाने आनंद यांना धक्का दिला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येच्या दृष्टीकोनातूनही तपास सुरु केला असला तरी थेट प्रसारमाध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासामध्ये न्यायाधीशांच्या या संक्षयास्पद अपघातामधील रिक्षा ही चोरीची आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या एका वृत्तामध्ये ही रिक्षा पाथरडीह येथील रहिवाशी असणाऱ्या सुगनी देवी यांच्या नावे नोंदणी केलेली आहे. सुगनी यांनी दिलेल्या जबाबानुसार रात्रीपासूनच त्यांची रिक्षा चोरीला गेलीय. यासंदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार केल्याचंही सुगनी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये आता धनबादमधील बड्या व्यक्तींची चौकशी होणार असल्याचं स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे.

आनंद हे माजी आमदार संजीव सिंह यांचे निकटवर्तीय असणाऱ्या रंजय हत्याकांड प्रकरणाची सुनावणी करत होते. याच कारणामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केलाय. या प्रकरणामध्ये तीन दिवसांपूर्वीच आनंद यांनी उत्तर प्रदेशमधील शूटर अभिनव सिंह आणि होटवार तुरुंगामध्ये बंद असणाऱ्या अमन सिंहशी संबंध असणाऱ्या शूटर रवी ठाकरू आणि आनंद वर्माचा जामीन अर्ज फेटाळला होता. आनंद हे कतरासमधील राजेश गुप्ता यांच्या घरी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणासारख्या महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी करत होते.