गेल्या काही दिवसांपासून रुपयाचं मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाल्याचं बाजारातील आकडेवारीवरून दिसून आलं आहे. या आठवड्यात गुरुवारी रुपयानं तब्बल ८३ पैशांचं अवमूल्यन नोंदवलं. गेल्या सात महिन्यांतली ही सर्वात मोठी पडझड होती. शुक्रवारीही रुपयानं आपला उलटा प्रवास कायम ठेवला असून तब्बल ३० पैशांनी रुपया पडला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आता रुपयाचं मूल्य थेट ८१.०९ इतकं झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात वेगळी भूमिका मांडत गुंतवणूकदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातली शिखर बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि रुपयाच्या घटत्या दरावर लक्ष ठेवून असल्याचं निर्मला सीतारमण यांनी शनिवारी माध्यमांना सांगितलं. मात्र, इतर देशांच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन कमी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

“इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे कुठलं चलन जर कमीत कमी प्रभावित झालं असेल, तर तो रुपया आहे. या बाबतीत आपण चांगली कामगिरी केली आहे”, असं सीतारमण यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुपयाचं आत्तापर्यंतच सर्वाधिक अवमूल्यन झालेलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक बाजूवर लक्ष असून रुपयाच्या बाबतीत आपण चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर चलनांचं अवमूल्यन होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.