दहशतवादविरोधी राष्ट्रीय केंद्रे स्थापन करण्यास विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्य सरकारे विरोध करीत असल्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप भाजपने फेटाळला असून दहशतवादासारख्या गंभीर मुद्दय़ावर केंद्र सरकारने राजकारण करू नये, असे बजावले आहे.
हैदराबाद स्फोटांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे या प्रश्नावर सरकारने राजकारण करणे टाळून योग्य पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिक समन्वयाची गरज आहे, असे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
एकमेकांना दूषणे देण्याऐवजी सरकारने गुप्तचर यंत्रणा सक्षम करावी आणि केंद्र आणि राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करावी, अशी मागणीही प्रसाद यांनी केली.