भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली अशांमध्ये आघाडीवर घेतले जाणारे नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. १९०६ साली मध्यप्रदेशमध्ये भाबरा या गावात जन्मलेल्या चंद्रशेखर यांची आज जयंती असून त्यांचे काम समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी घेतलेली उडी, पुढे अतिशय अवघड प्रसंगातही देशासाठी लढण्याची असणारी तयारी, स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान आणि एकूणच त्यांच्या कार्याची ओळख करुन घेऊया…

– चंद्रशेखर १४ व्या वर्षी बनारसला गेले आणि एका संस्कृत पाठशाळेत त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

– १९२० मध्ये ते महात्मा गांधी यांच्या असहयोग आंदोलनाशी जोडले गेले. त्याचवेळी त्यांना ताब्यात घेतले गेले.

– त्यावेळी त्यांना नाव विचारले असता त्यांनी आझाद, वडिलांचे नाव स्वतंत्रता आणि आपले राहण्याचे ठिकाण कारागृह असे अतिशय विश्वासाने सांगितले.

– १९२२ मध्ये महात्मा गांधींनी आपले आंदोलन मागे घेतले तेव्हा चंद्रशेखर यांनी अंहिसा सोडून मवाळ मार्गाकडून जहाल मार्गाकडे जाण्याचे ठरवले.

– मग आझाद रामप्रसाद बिस्मिल यांच्या असलेल्या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेशी ते जोडले गेले. यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

– सरकारी खजाना लुटून संघटनेच्या क्रांतीकारी कार्यासाठी पैसे जमवण्याचे काम त्यांनी सुरु केले. हे सगळे धन भारतीयांचेच आहे जे इंग्रजांनी लुटले आहे असे त्यांचे म्हणणे होते.

– इंग्रजांकडून आपण पकडले जाणे आणि त्यांच्या हातून आपल्याला फाशीची शिक्षा होणे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी स्वत:लाच गोळी मारुन आत्महत्या केली.