भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अरूणाचल प्रदेशच्या संदर्भातील चीनच्या विस्तारवादी मनोवृत्तीला फटकारले होते. त्यानंतर सोमवारी लगेचच मोदींच्या या विधानावर चीनने आपली भूमिका स्पष्ट करताना आपण आजपर्यंत भूभाग बळकवण्यासाठी कोणत्याही देशावर युद्ध लादले नसल्याचे सांगितले आहे. शेजारील देशांबरोबर चांगले संबंध रहावेत यासाठी चीन कायम प्रयत्नशील राहिला असल्याचे चीन परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले आहे. गेल्या कित्येक वर्षात चीनला लागून असलेल्या ईतर देशांच्या सीमांवर आणीबाणीचे कोणतेही प्रसंग उद्बवलेले नाहीत, यावरून चीन शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. भविष्यात अशाप्रकारची परिस्थिती असणे भारत आणि चीन दोन्ही देशांतील संबंधाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल. तसेच १९६२ नंतर सायनो-भारत सीमेवर कोणतेही मोठे वाद उभे राहिले नसल्याचे हुआ चुनयिंग यांनी सांगितले आहे.