राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल अंबानींवर ४५ हजार कोटींचे कर्ज असूनही सरकारने राफेल करारात रिलायन्सला का कंत्राट दिले, असा सवाल उपस्थित करत देशाच्या चौकीदाराने पैसे चोरून अनिल अंबानी यांना दिले, असा आरोप त्यांनी केला.

राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारची कोंडी केली आहे. राहुल गांधी व काँग्रेसचे अन्य नेते राफेलवरुन मोदी सरकारवर प्रहार करत आहेत. मंगळवारीही राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. अनिल अंबानींवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही अनिल अंबानीना कंत्राट का दिले ?, याबाबत मी मोदींना प्रश्न विचारले, पण प्रश्न विचारल्यावर मोदी दुसरीकडे पाहून उत्तर देणे टाळतात. या प्रश्नांचे उत्तर ते डोळ्यात डोळे घालून का देऊ शकले नाही?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. देशाच्या चौकीदारानेच हवाई दलाचे आणि तरुणांच्या रोजगाराचे पैसे चोरून अनिल अंबानीच्या खिशात टाकले, असा आरोप त्यांनी केला.

भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या तसेच शहीद झालेल्या प्रत्येक अधिकारी आणि जवानाला, ‘एचएएल’च्या अधिकाऱ्यांना मी इतकंच सांगू शकतो की तुमचे दुःख आणि वेदनांची आम्हाला जाणीव आहे. तुमचा हक्क हिरावून घेणाऱ्यांविरोधात लढा देऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.