पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली. भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले असता जमावाने एनआयएच्या पथकातील वाहनांची तोडफोड करत हल्ला केला. या घटनेत दोन अधिकारी जखमी झाले. यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत एनआयएच्या पथकाने रात्री छापा का टाकला? एनआयएने पोलिसांची परवानगी घेतली होती का?, असे अनेक प्रश्न विचारले आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“एनआयएने मध्यरात्री छापा का टाकला? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? मध्यरात्री आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती, तशीच स्थानिकांनी दिली. निवडणुकीच्या आधी लोकांना अटक का करत आहेत? भाजपाला असे वाटते की ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? यासाठी एनआयएला काय अधिकार आहेत?”, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खडेबोल सुनावले.

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी भूपतीनगरमध्ये महिलांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “एनआयएचे अधिकारी लोकांच्या घरात घुसत असतील तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व केले जात आहे, पण आम्ही सर्वांना आवाहन करतो की, भाजपाच्या या अशा पद्धतीच्या राजकारणाविरोधात लढा”, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

नेमके प्रकरण काय ?

डिंसेबर २०२२ च्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक आज (६ एप्रिल) भूपतीनगर भागात दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मुत्यू झाला होता. याचा तपास एनआयएकडून सुरु आहे. या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात काहींना नोटीसा देण्यात आल्या होत्या. पण ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर एनआयएने त्यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. यानंतर भूपतीनगर येथे आलेल्या एनआयएच्या पथकावर संतप्त जमावाकडून हल्ला करण्यात आला. दगडफेक करत अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे घडली.