‘कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे राहात नाही’ ही म्हण आपण सहज म्हणून वापरतो खरी, पण कोंबडे आरवण्यामागील शास्त्रीय कारण नेमके कोणते, याची उकल झाली असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रश्नावर गेले काही महिने संशोधन सुरू होते. आणि कोंबडय़ांच्या आरवण्याचा सूर्योदयाशी काही संबंध असेल का यावर शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. मात्र नवीन संशोधनात या शंकेचा उलगडा झाला आहे.
कोंबडे आरवण्याचे खरे कारण हे त्यांच्या गुणसूत्रीय संरचनेत आहे. कोंबडय़ांना सूर्योदयावेळी वातावरणात होणारे बदल जाणवतात आणि म्हणून ते आरवतात, असा समज प्रचलित होता. मात्र नवीन संशोधनानुसार, त्यांची शारीरिक संरचना आणि गुणसूत्रांची मांडणी यासाठी कारणीभूत असल्याची बाब पुढे आली आहे.
विज्ञानविषयक नियतकालिक ‘करंट बायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखात जपानच्या नागोया विद्यापीठाच्या तकाशी योशिमुरा यांनी उपरोक्त दावा केला आहे.
कोंबडय़ांना खरोखरीच तांबडे फाकल्याचे कळते का, हे तपासण्यासाठी योशिमुरा आणि त्यांचे सहकारी सुयोशी शिम्मुरा यांनी अनोखा प्रयोग केला. त्यांनी काही कोंबडय़ांना सतत पहाटसदृश प्रकाशाच्या सान्निध्यात ठेवले आणि त्यांचे प्रतिसाद ध्वनिमुद्रित केले. मात्र केवळ पहाट होण्यापूर्वीच कोंबडे आरवतात असे लक्षात आले. यावरून त्यांच्या शरीरांतर्गत ‘जैविक घडय़ाळा’चा अर्थात गुणसूत्रीय संरचनेचा आरवण्याशी संबंध असल्याचा निष्कर्ष योशिमुरा यांनी काढला.
यादृष्टीने अधिक संशोधन सध्या सुरू असून कुत्रे का भुंकतात, मांजरींचा आवाज विशिष्टच का असतो, याबाबतही अधिक संशोधन करणार असल्याचे योशिमुरा यांनी सांगितले.