पीटीआय, नवी दिल्ली

इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता गृहित धरून भारताने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार भारतीयांनी दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये, असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. तर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पराकोटीला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे सावट आहे.

इस्रायलने ११ दिवसांपूर्वी इराणच्या सिरीयातील दूतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर या दोन देशांतील तणाव कमालीचा शिगेला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. भारतानेही शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीयांना खबरदारीचा इशारा दिला. इराण आणि इस्रायलबरोबरच भारतीयांनी म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले आहे. भारत म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई

यापुढे इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी आणखी भारतीय कामगारांना पाठवले जाणार नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ६४ भारतीय कामगारांची एक तुकडी इस्रायलला पाठवण्यात आली होती. तसेच एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सहा हजारांहून अधिक कामगारांना इस्रायलला पाठवण्यात येणार होते, असे सूत्रांनी सांगितले.

इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्वांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपल्या नवाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

मेरिका, फ्रान्सचीही खबरदारी

अमेरिका आणि फ्रान्सनेही मार्गदर्शक सूचना जारी करून इस्रायल आणि इराणचा प्रवास न करण्याचा सल्ला कालच आपले नागरिक आणि अधिकाऱ्यांना दिला आहे. तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीयांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलला प्रवास करू नये, असा सल्ला भारताने दिला आहे.

हेही वाचा >>>श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका

पश्चिम आशियावर युद्धाची छाया

सिरीयातील इराणी दूतावासावरील हवाई हल्ल्यात ठार झालेल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा सूड घेण्याची धमकी इराण देत आहे. १ एप्रिलचा तो हल्ला इस्रायलनेच केल्याचा इराणचा आरोप आहे. तथापि, इस्रायलने मात्र अद्याप हल्ल्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र दोन्ही देशांतील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमू लागल्याचे चित्र आहे.

काय घडले?

इस्रायलने १ एप्रिलला सिरीयाची राजधानी दमास्कस येथे असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यापूर्वी इराणचे समर्थन असलेल्या हुती बंडखोरांनी इस्रायलमधील लष्करी तळांवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.