पीटीआय, उधमपूर

काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांना भारतातील बहुसंख्याकांची पर्वा नसून त्यांच्या भावनांचा अपमान करण्यास त्यांना धन्यता वाटते. श्रावण महिन्यात काही नेते मांसाहारावर ताव मारत असून त्याच्या चित्रफिती तयार करून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

गेल्या वर्षी श्रावण महिन्यात लालूप्रसाद यादव यांना भेटायला गेलेल असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांनी मटन खाऊ घातले होते. पंतप्रधान यांनी काश्मीरमधील उधमपूर येथे आयोजित प्रचारसभेत हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांची तुलना मुघलांशी केली आहे. श्रावण महिना सुरू असताना मटन खाऊन या नेत्यांनी देशातील जनतेला चिडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

काय खावे यावर कोणताही कायदा नाही. प्रत्येकाला शाकाहारी वा मांसाहारी आहार करण्याचे स्वातंत्र्य आहे. या दोनही नेत्यांचे हेतू वेगळे होते. मुघलांना राजांना पराभूत करून नव्हे, तर मंदिरांची मोडतोड करून आनंद मिळत असे. या नेत्यांनाही श्रावण महिन्यात अशा चित्रफिती तयार करून देशातील जनतेला चिडवण्याचा आनंद मिळत आहे. याद्वारे ते आपली मतपेढी मजबूत करत आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केला. नवरात्रीच्या काळात मांसाहार केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातात, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

‘राम मंदिर निवडणुकीचा मुद्दा नाही’

अयोध्येतील राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढविला. राम मंदिर हे देशातील नागरिकांसाठी श्रद्धेची बाब आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा कधीही नव्हता आणि होणारही नाही, असे पंतप्रधान म्हणाले. ‘‘काँग्रेसला राम मंदिराचा तिरस्कार कसा आहे हे तुम्ही पाहिले असेल. मंदिराचा संदर्भ असला तरी काँग्रेस आणि तिची संपूर्ण परिसंस्था ओरडू लागते. ते म्हणतात की राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा आहे. तो कधीच निवडणुकीचा मुद्दा नव्हता. आणि तो कधीही निवडणुकीचा मुद्दा होणार नाही,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले. भाजपचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून राम मंदिर आंदोलन सुरू आहे. राम मंदिर ही ५०० वर्षे जुनी बाब आहे, असे ते म्हणाले.

राज्यघटना बदलण्याचा आरोप तथ्यहीन -मोदी

जयपूर : भाजप सत्तेत आली तर राज्यघटना नष्ट करतील हा विरोधकांचा आरोप तथ्यहीन आहे. भाजप राज्यघटनेचा आदर करत आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तर तेही राज्यघटना रद्द करू शकत नाही, असे मोदी यांनी सांगितले. देशाची राज्यघटना सरकारसाठी सर्वस्व आहे. देशात आणीबाणी लादून काँग्रेसने राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असे मोदी यांनी सांगितले. भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी घटनादुरुस्तीसाठी पक्षाला दोन तृतीयांश बहुमताची गरज असल्याच्या विधानानंतर ‘नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांची राज्यघटना नष्ट करणे हे आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात केला होता. भाजपने हेगडे यांच्या वक्तव्याला ‘वैयक्तिक मत’ ठरवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.

आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत टीका

इंडिया आघाडीतील एका पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत लिहिले आहे. भारतासारख्या देशाच्या दोन्ही बाजूंचे शेजारी अण्वस्त्रेयुक्त असताना आपण अण्वस्त्रे नष्ट करण्याचा विचार करावा का, असा सवाल मोदी यांनी केला. इंडिया आघाडी कुणाच्या सूचनेवर काम करत आहे, असे मला काँग्रेसला विचारावेसे वाटत आहे, असे मोदी यांनी सांगितले. इंडिया आघाडी भारताला शक्तीहीन बनवू इच्छिते. काँग्रेसची विचारसरणी विकासविरोधी आहे आणि देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यांना माजी काँग्रेस सरकारांनी जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

मोदींचे राजकारण पोरकट- काँग्रेस

पंतप्रधानांनी मांसाहाराच्या मुद्दय़ावरून टीका केल्याबाबत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान लोकसभा निवडणकीपूर्वी घाबरले आहेत. ते दररोज नवीन मुद्दा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे राजकारण पोरकट व कंटाळवाणे आहे, अशी टीका काँग्रेस सरचिटणीय जयराम रमेश यांनी केली. पंतप्रधानांप्रमाणे आम्ही कोणत्या नेत्याने कोणत्या महिन्यात काय खाल्ले याचा मागोवा घेत नाही. त्याऐवजी आम्ही पोषण आहाराच्या आकडेवारीचा मागोवा घेत आहोत. लोहाची कमतरता, अपुरा आहार आणि इतर पोषक तत्त्वांची कमतरता यांमुळे अ‍ॅनिमिया होतो. पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये पाच वर्षांखालील १० पैकी आठ बालकांना अ‍ॅनिमिया झाला आहे, असे रमेश म्हणाले.