हिमाचल प्रदेशात पुन्हा कधीही काँग्रेसची सत्ता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते शनिवारी रैत येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तिखट शब्दात टीका केली. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने निवडणुकांच्या आधीच पराभव मान्यच केला आहे. काँग्रेसला हिमाचलमधून हद्दपार करा आणि भाजपला निवडून द्या असे आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्षातील नेत्यांचाच काँग्रेस पक्षावरून विश्वास उडाला आहे. पक्षावरून विश्वास उडालेले काँग्रेस नेते इतर पक्षांमध्ये जागा मिळते का, यासाठी प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसचा कोणताही मोठा नेता या ठिकाणी प्रचारासाठीही आलेला नाही. काँग्रेसने लढाईच्या आधीच मैदान सोडले आहे आणि निकाल नशीबावरच सोडून दिले आहेत. या काँग्रेसचे अस्तित्त्व हिमाचलमधून संपवून टाका असे आवाहनही मोदींनी केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सध्या जगात भारताचा डंका वाजतो आहे, तो माझ्यामुळे नाही तर देशातील सव्वाशे कोटी जनतेमुळे आहे. देशात हिमाचलचे नाव चमकवायचे असेल तर भाजपला तीन चतुर्थांश बहुमत देऊन जिंकून द्या, असेही सांगायला मोदी विसरले नाहीत. आम्ही सत्तेत आलो तर हिमाचलमधील प्रत्येक घरात पाईप गॅसची सेवा पुरवू, असे आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.

देशाचा विकास होणे हे आमचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारच. विकासाची वाट काहीशी खडतर आहे तरीही ते स्वप्न आम्ही पूर्ण करणारच असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. देशातील खेड्यांची अवस्था आम्हाला बदलायची आहे. अधिकाधिक सक्षम करायची आहेत असेही मोदी यांनी म्हटले