पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते, अशी टीका विरोधकांच्या आघाडीवर केली. मोदींनी केलेल्या या टीकेला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते बंगळुरुमध्ये आयोजित युवक काँग्रेसच्या अधिवेशनात बोलत होते.

कन्हैय्या कुमार म्हणाले, “आज देशाचा कारभार ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या हातात नाही. आज देशाचा कारभार परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या आणि भारतीय संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात नाही. आज देशाचा कारभार २३ व्या वर्षी हसतहसत फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या हातात नाही.”

“ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही, ते देशाची जबाबदारी उचलेल का?”

“आज देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही. ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? आज देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे जो व्यक्ती म्हणतो की, पीआयएफच्या नावातही इंडिया आहे,” असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “मोदींची मणिपूरवर बोलायची हिंमत नाही आणि…”, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

“मोदींनाही दोन डोळे आणि गाढवालाही दोन डोळे”

“म्हणजे कुत्र्यालाही चार पाय असतात. गाढवालाही चार पाय असतात. त्यामुळे सर्व गाढवं कुत्री आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो तर्क लावतात तो तर्क मी लावला, तर मी असं म्हणू शकतो की मोदींनाही दोन डोळे आहेत आणि गाढवालाही दोन डोळे आहेत. मला भाजपा, मोदी व आरएसएसवर बोलण्याची इच्छा नाही. मला केवळ आपण आज किती गंभीर परिस्थितीत उभे आहोत हे सांगायचं आहे,” असं म्हणत कन्हैय्या कुमार यांनी मोदींवर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

भाजपेतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते, अशा शब्दांत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी शरसंधान केले. तर हा मणिपूरवरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.