नवी दिल्ली : ‘जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक होती, काँग्रेस पक्षाची नव्हे’ अशी जाहीर कबुली काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली. यासह ही चूक आता सुधारण्यासाठी पावले टाकली असल्याची पुस्तीदेखील त्यांनी जोडली.
अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हितांचे ज्या प्रमाणात संरक्षण व्हायला हवे होते, ते न होणे हीच माझ्या एकवीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील चूक असल्याचेदेखील राहुल गांधी म्हणाले. ते तालकटोरा येथे आयोजित ‘ओबीसी नेतृत्व- भागीदारी न्याय संमेलना’स संबोधित करीत होते. तेलंगणमधील जातनिहाय जनगणना ‘राजकीय भूकंप’ असून त्यामुळे देशातील राजकीय पाळेमुळे हलली असल्याचा दावादेखील त्यांनी या वेळी केला.
दरम्यान, १०-१५ वर्षांपूर्वी ओबीसींच्या समस्यांची जाण नव्हती पण दलितांच्या समस्या मात्र स्पष्टपणे समजल्या, अनुसूचित जमातींचे प्रश्नदेखील स्पष्टपणे समजू शकतात तथापि, ओबीसींचे प्रश्नच समजू शकलो नाही, असे राहुल म्हणाले. इतिहासाबद्दल आणि प्रश्नांबाबत अधिक माहिती असती तर जातनिहाय जनगणना आधीच केली असती, असेही ते म्हणाले.
‘तेलंगणातील जातनिहाय जनगणना राजकीय भूकंप’
जातनिहाय जनगणना आधी न करणेही योग्यच होते, असा दावादेखील राहुल गांधी यांनी केला. यासाठी तेलंगणचे उदाहरण देत ती आता ज्या पद्धतीने करण्यात येत आहे त्या पद्धतीने करण्यात आली नसती, असे ते म्हणाले. तेलंगणातील जातनिहाय जनगणना राजकीय भूकंप असून त्याचे धक्के अद्याप जाणवले नसले तरी त्याचा परिणाम झाला असल्याचा दावाही त्यांनी केला.
मी २००४ पासून राजकारणात आहे. जेव्हा मागे वळून पाहतो आणि आत्मचिंतन करतो तेव्हा कुठे योग्य काम केले आणि कुठे नाही हे उमजते. माझ्या दृष्टीने दोन ते तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत – भूसंपादन विधेयक, मनरेगा, खाद्यान्न विधेयक, आदिवासींसाठी लढा. या गोष्टी मी चुकीच्या केल्या. तथापि, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचा विचार केला तर मला चांगले गुण मिळायला हवे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा