गेल्या ७ वर्षांपासून काँग्रेस केंद्रात सत्तेपासून दूर आहे. या मधल्या काळामध्ये काँग्रेससमोर अनेक मोठमोठी आव्हानं उभी राहिली आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षाला रामराम ठोकून भाजपा किंवा इतर पक्षांच्या मार्गाला लागली आहेत. मात्र, तरीदेखील अजूनही काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाला सक्षम नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या जोडीला निष्ठावान कार्यकर्ते-नेत्यांची गरज असल्याचं मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यात आता खुद्द काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीच आपल्याच पक्षातल्या नेतेमंडळींची शाळा घेतली आहे. गुजरातमधील पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलताना राहुल गांधींनी काँग्रेसमधील दोन वर्गांचा उल्लेख केला आहे. गुजरातमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षाखेरीस गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षानं कंबर कसली आहे. त्यासाठीच आजच्या चिंतन शिबिराची आखणी करण्यात आली होती. या शिबिरात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वपक्षीय नेतेमंडळींची चांगलीच कानउघाडणी केली. "काँग्रेसमध्ये नेते-कार्यकर्त्यांचे दोन वर्ग दिसत आहेत. एक म्हणजे जे बोलतात आणि एक म्हणजे जे प्रत्यक्ष काम करतात. एकीकडे पक्षात अशी लोकं आहेत जी २४ तास लोकांमध्ये राहून काम करत असतात. टीका-टिप्पणी सहन करतात. दुसरीकडे अशी लोकं आहेत, जी फक्त एसीमध्ये बसून मोठमोठी भाषण ठोकतात, मजा मारतात", असं राहूल गांधी म्हणाले आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून पक्ष दूर गेला असल्याचं देखील राहुल गांधी म्हणाले. "…त्यांनी खुशाल भाजपामध्ये जावं" दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पक्षात काम न करणाऱ्यांना भाजपामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. "आपण जनतेला काँग्रेसमधल्या अशा लोकांची यादी दिली पाहिजे, जे काम करतील आणि राज्याला योग्य मार्ग दाखवतील. पण दुसरीकडे या कामात अडथळा आणणारे देखील लोक आहेत. ते भाजपामध्ये जाऊ शकतात", असं राहुल गांधी म्हणाले. “…म्हणून अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं”, राहुल गांधींनी सांगितलं तेव्हा नेमकं काय झालं होतं! सध्या देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून १० मार्च रोजी या पाचही राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लागणार आहे. तर गुजरातमध्ये या वर्षाखेरीस निवडणुका होणार आहेत. २०१७मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं १८२ पैकी ७७ जागांवर विजय मिळवला होता.