नवी दिल्ली : सनातन धर्म नष्ट करण्यासाठी ‘इंडिया’ची स्थापना झाल्याचे वादग्रस्त विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री व ‘द्रमुक’चे नेते के. पोनमुडी यांनी केल्याने सनातन धर्मासंदर्भातील वाद आणखी तीव्र झाला आहे. सनातन धर्मावर ‘इंडिया’तील घटक पक्ष हल्लाबोल करत असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी बाळगलेल्या मौनातून त्यांचा पोनमुडींच्या विचारांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. या दोघांच्या सुनियोजित रणनितीतून ‘इंडिया’ जन्माला आली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी केला. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर उदयनिधी स्टॅलिन, प्रियंक खरगे यांनी सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली. आता ‘द्रमुक’चे मंत्री यांनी सनातन धर्मावर पुन्हा हल्ला केला आहेत. सनातन धर्माविरोधात ‘इंडिया’ उभी राहिल्याचे स्पष्ट झाले असून या मुद्दय़ावर काँग्रेस व ‘इंडिया’ने भूमिका जाहीर करावी, असे नड्डा म्हणाले. कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. ‘इंडिया’तील नेत्यांना संविधानातील तरतुदी माहिती नाहीत का, अशा शब्दांत नड्डा यांनी संताप व्यक्त केला. सनातन विरोध हाच समान कार्यक्रम- प्रसाद भाजपच्या मुख्यालयामधील पत्रकार परिषदेत मंगळवारी पक्षाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी, सनातन धर्मविरोधी रणनिती हा अहंकारी ‘इंडिया’चा किमान समान कार्यक्रम असल्याचा आरोप केला. ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये इतर धर्मावर टीका करण्याची वा त्यांचा अपमान करण्याची हिंमत आहे का? शेकडो वर्षे भारतावर राज्य करूनही मुस्लिम आक्रमकांना वा इंग्रजांना सनातन धर्म नष्ट करता आला नाही. हे घमंडी आघाडीने लक्षात ठेवावे, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले. राहुल गांधींवर टीका मी गीता, उपनिषदे वाचली आहेत. भाजपचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पॅरिसमधील भाषणामध्ये केली होती. या संपूर्ण भाषणात ‘सनातन धर्म’ या शब्दाचा उल्लेख न केल्याने केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी गांधी यांना लक्ष्य केले. राहुल गांधी हिंदू धर्मावरून भाजपवर टीका करत असले तरी, सनातन धर्माविरोधी टिकेवर बोलत नाही, यावर ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. प्रेमाच्या दुकानात द्वेषाचा माल-नड्डा भाजपविरोधातील ‘इंडिया’च्या स्थापनेमागे सोनिया गांधी व राहुल गांधी असून प्रेमाच्या दुकानाच्या नावाखाली सनातन धर्माच्या विरोधात द्वेषाचा माल विकला जात आहे. द्वेषाचा हा मेगा मॉल फक्त सत्तेसाठी असून फूट पाडा आणि राज्य करा हेच काँग्रेस व ‘इंडिया’चे धोरण असल्याची टीकाही नड्डा यांनी केली. उद्धव ठाकरेंवर टीका भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. राम मंदिराचे उद्घाटन झाले तर गोध्रासारखी घटना घडू शकते, ही उद्धव ठाकरे यांची टिप्पणी लज्जास्पद व वेदनादायी आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असे कसे बोलू शकतात? बाळासाहेब ठाकरे यांनी राममंदिर आंदोलनात सहभागी होण्याचे धैर्य दाखवले होते. आता त्यांचा मुलगा विरोधी भाष्य करत आहे, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले.